वारी- व्यंकटेश माडगूळकर

लेक नुकताच गावातून तुकडे मागून आला होता. पागुटे काढून भुईवर बसला होता. त्याचा लहानगा पोरगा त्याच्या मिशा ओढीत होता. बापाचे हे बोलणे ऐकताच पोराला मांडीवर ओढून त्याचा मुका घेत तो म्हणाला, ‘‘ह्यो थकिस्त जीव घिऊनकसा जाशील? तुझ्यानं वाटचाल व्हनार न्हाई!’’सून तान्हे पोर पाजीत होती. ती म्हणाली, ‘‘अवं, अगुदर तरी बोलायचं.आपल्या गावची समदी वारकरीमंडळी गेली. आता सोबत कुनाची? एकलं कसंजाल?’’
अर्जुनाला नीट ऐकू आले नाही. कानाला हात लावून तो लेकापाशी सरकला आणि म्हणाला, ‘‘का म्हनालास पोरा?’’
मग लेकाने आवाज चढवला. म्हाताऱ्याच्या कानापाशी तोंड नेऊन तो ओरडला,‘‘वारकरी मानसं कवाच गेली. तुला सोबत कुनाची? आन् आता थकलास. बाराकोसाची वाटचाल तुझ्यानं व्हनार कशी?’’
सून बोलली, ‘‘आन् वारीच्या दिवसांत मायंदाळ गर्दी आसती, रोगराई आसती.अंमलदार धरून टोचत्याल. दंडात सुई खुपसत्याल. म्हाताऱ्याचा निबाव न्हाई लागनार ततं!’’
भुईशी हात टेकून लेकाकडे बघत अर्जुनाने उत्तर दिले, ‘‘आरं, जाईनबसत-उठत. इटुबा दील माज्या पायात बळ!’’त्यावर सून बोलली, ‘‘हं, इटुबा देतुया ताकद! वाटंतच परान जाईल – कायतरीच म्हाताऱ्याचं!’’
मग अर्जुना खाली बघत उगाच बसला. लेकाला वाईट वाटले. बायकोवर डोळे वटारून तो बापाला म्हणाला, ‘‘जा, तुजी विच्या आसली तर. पन चालत नगंजाऊस, मोटारीनं जा!’’अर्जुनाने डोळे मिटून मान हलवली, ‘‘आरं, मोटारीनं जानं खरं न्हवं. आपनकुटं इकतं तालेवार हाय? मोटारीसाटनं पैका खर्ची घालनं खरं न्हवं!’’त्यावर कुणी बोलले नाही. सून बोलली नाही, लेक पोराच्या कानात कुर्रर्रकरून त्याला हसवू लागला. पोरगा खिदळून तंगड्या झाडू लागला तशी सूनही कौतुकाने त्याच्याकडे बघत राहिली.मग अर्जुना अंगावरची चिरगुटे गोळा करून कोपऱ्यात सरकत बोलला, ‘‘बगा,माज्या मनाला वाटतंय. तुमची मर्जी नसली तर ऱ्हायल. बसतू बापडा गप्!’’ आणि कोपऱ्यात पाय आखडून बसलाही. मग लेक कष्टी झाला. म्हातारपणी आपल्या बापाची इच्छा आपण पुरविली नाही, तर त्याचा आत्मा हळहळेल म्हणून त्याला अवघड वाटले. तो बायकोला म्हणाला, ‘‘अगं, जाऊ दे त्येला. म्हातारपनी देवाधर्माची सई लई हुती. त्येचं मन आता परपंचात न्हाई. सरत्या काळात त्याला देवाला भेटू दे!’’नवऱ्याचा दुजोरा आला तशी तिला बोलणे प्राप्त झाले, ‘‘जाईनात बापडं! मी कुटं नगं म्हनतीया? आन् आता म्हनं देवळंबी आपल्या लोकास्नी उघडी झाल्याती.थेट इटुबाच्या पायांवर डोस्क टेकाया मिळतंया म्हनं!’’बायकोचा दुजोरा मिळाला तसा लेक बापाच्या कानात ओरडला, ‘‘जा रं तू!आमची ना न्हाई. वारीचंच दीस हैती. कुनाचीबी सोबत मिळंल. वारकऱ्याची रीघ लागली आसंल वाटेनं!’’
‘‘जा तुमी मामाजी, आपल्या हतलं कैक जन देवदर्शन घिऊन आलं म्हनं.’’
‘‘व्हय, व्हय. त्यो तुका म्हार पाक आत जाऊन देवाच्या पायावर डोस्क टेकून आला. या गांधीबाबांच्या राज्यात इटाळचंडाळ पाक गेला. त्या पुण्यवान बाबानं आमा लोकांस्नी देव दावला. पयलं आमा लोकांची सावली दिकून कुनी अंगावर घेत न्हवतं. रस्त्यावर थुकायची दिकून बंदी! गळ्यात लोटक बांधून त्यात थुकायचं. त्योकाळ पाक गेला. महार लोकांचा वनवास चुकला.’’
‘‘व्हय, चुकला! तुमी जामामाजी, इटुबाराया बगून या.’’लेक आणि सून यांनी असे बोलताच अर्जुना हरकला. तुका म्हारावाणी आपल्यालाही देवाच्या पायावर डोक ठेवायला मिळणार म्हणून त्याला आनंद झाला.लेकाच्या चांगुलपणामुळे गहिवरल्यागत झाले. मग त्याने नातवाला आपल्यापाशी ओढून घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. आज्याच्या मिशांचे आणि वाढलेल्यादाढीचे केस रुतू लागले, तेव्हा नातू गाल चोळू लागला.मग म्हाताऱ्याची वारीला जाण्याची तयारी झाली. सुनेने सासऱ्याच्या अंगावरची धडुती सवळेच्या मातीने खळणी केली. लेकाने बापाचा फाटका जोडा चांभाराकडून शिवून आणला. सुनेने व्हंढीच्या आठ-दहा जाड भाकरी केल्या. त्याच्यामध्ये मिरची-कांदा घालून शिदोरी बांधली. पाठीशी घोंगड्याची खोळ टाकून, कमरेला धोतर गुंडाळून अर्जुना पंढरीला जाण्यास निघाला. लेकाने त्याला आठ-चार आणे खर्चायला दिले.
वरचेवर ‘येतू रं’, ‘येतू रं’, करीत तो घरातच घुटमळू लागला. मन कितीही विटले तरी हे असेच आहे. अर्जुनाचा पाय लवकर घरातून निघेना. मग धाकला नातू आला आणि धोतराला लोंबकळीत म्हणाला, ‘‘आमाला डाळं, चिरमुरं, बत्तासं आन बरं का!’’म्हातारा म्हणाला, ‘‘व्हय, आनीन माज्या लेकराला!’’आणि पुन्हा लेक आणि सून यांना बोलला, ‘‘जातू मी. ह्याला नीट बगा, मी लगी म्हागारी येतूच.’’
त्यावर सून बोलली, ‘‘बरं, निगा आता. उनाच्या आत जेवडी वाटचाल हुईलतेवडी बरी!’’
आणि अर्जुना निघाला पाठीशी घोंगड्याची खोळ टाकून. काथ्याने बांधलेला जोडा ओढीत गावाबाहेर पडला. लेक वेशीपर्यंत घालवत आला होता, त्याला म्हणाला, ‘‘अरं, तू फीर आता म्हागारी. नगू तकाटा घिऊस!’’
‘‘संबाळून जा. भाकरी लई वाळल्या, चावन्यासारक्या न्हाई ऱ्हायल्या, तर व्हटेलातनं काय तरी घिऊन खा पोटाला. पैशे देऊ का आजून?’’
‘‘नगं, नगं, हायतं की माज्यापाशी.’’मग लेक माघारी फिरला आणि म्हातारा चालू लागला. अर्जुना महार पंढरीच्या वाटेला लागला. कधी सडकेने तर कधी पाऊलवाटेने चालावे; थकल्यासारखे वाटल्यास एखादे झाड बघून त्याच्या सावलीखाली घडीभर विसावा घ्यावा आणि पुन्हा वाट धरावी. वाटसरूशी चार गोष्टी करीत रस्ता लवकर तोडावा. रात्र झाली तर गाव गाठून धर्मशाळेत गबाळे टावूâन भाकर खावी आणि घोंगडे अंथरून त्यावरपडावे. पहाटे चांदणी उगवताच उठून पुन्हा चालू लागावे. असे करीत अर्जुनानेमजल मारली आणि सकाळच्या प्रहरी तो त्या पुण्यनगरीत पोचला.
‘धन्य ही पंढरी... सुखाची मांदूस!’
या पंढरीत आजवर किती संत आले, गेले... किती जणांचे पाय इथे लागले!तो योगियांचा राजा ज्ञानदेव, तो त्याचा परात्पर गुरू निवृत्ती, तो सोपान, ती मुक्ताबाई, तो भोळा नामा आणि त्याची दासी जनी, देहूचा वेडा, तो अरभेंडीचा माळी, तेरढोकीचा कुंभार आणि तो चोखा महार! धन्य-धन्य ही पंढरी! संत म्हणतात, ‘जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।’ या पंढरीत पोचताच अर्जुनाचाशीण पार उतरला. चंद्रभागा दिसताच त्याने दोन्ही हात जोडले, ‘‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल!’’चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णवांचा मेळा जमला होता. अपार भक्तगण जमला होता. बायाबापड्या, उचनीच, लहानथोर – सारे चंद्रभागेच्या निर्मळ जलात वासनेची पातके प्रभाळीत होते. ‘‘हरि हो! हरि हो!’’ म्हणून बुड्या घेत होते. हे दृश्य बघूनअर्जुना कावराबावरा झाला. गोंधळून गेला. वाळूत पाय रुतवून उगाच हा सोहळाबघत राहिला. मग एकाएकी त्याला वाटले, या गर्दीत घुसून आपणही पुढे व्हावेआणि या गंगेत बुडी घ्यावी. पावन व्हावे, निर्मळ व्हावे आणि त्या भरात पाठीवरचेगबाळे सावरीत त्याने पाऊलही उचलले. धारेच्या रोखाने तो सणाट्याने निघाला. पण..
You can purchase this book online. Visit- http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Vari/373.aspx